आपण समाज म्हणून ढोंगी आहोतच पण फार इमोशनलही आहोत.
आपला अहंगंड, इगो ही एक मस्त चीज आहे आणि त्यावरच सगळा खेळ सुरु आहे.
सर्वसामान्य लोकांना बेसिक सुविधा द्यायची ज्यांच्यावर जबाबदारी असते ते सरकार, ती राजकारणी मंडळी वर्षानुवर्षे आपल्याला फाट्यावर मारत असतात. पण वेळ आली की, ‘लोकशाहीत जनताच राजा आहे’ असं नेते म्हणतात, आपण खूश होतो. प्रत्यक्षात पाच वर्षात एकच दिवस- मतदान यंत्राचं बटन दाबेपर्यंत राजा, बाकी 1825 दिवस कोण कुठला राजा? एक दिवस प्रजासत्ताक, बाकी नेतासत्ताकच.
तिच गोष्ट साखर उद्योगाची. साखर कारखाने म्हणजे राज्यातल्या राजकारणाचा दिंडी दरवाजाच. लाखो शेतकरी आणि हजारो कोटींचा उद्योग. पण ऊसाला दर द्यायची वेळ आली की राजकारण्यांमधला कारखानदार जागा होतो. जास्त दर देणं कसं अवघड आहे यावर त्यांचं चटकन एकमत होतं. मग शेतकरी रस्त्यावर उतरला की त्याच्यावर लाठ्या काठ्या गोळ्या ठरलेल्या. यंदा तर अगदी पद्धतशीरपणे ऊसदराचं आंदोलन चिरडलं गेलं. आंदोलन करु नका, तुम्ही शेतकरीच कारखान्याचे खरे मालक आहात असं यच्चयावत सगळ्या राजकारण्यांनी सांगितलं. कानाला ऐकायला किती बरं वाटलं. मोठ्याने म्हणून बघा, शेतकरीच कारखान्याचे खरे मालक आहेत. वास्तव कोणत्याही छोट्या शेतकऱ्याला विचारा.
40- 40 वर्ष महाराष्ट्राच्या राजधानीत राहिलेले बॉलिवूड स्टार्स कधीतरी कुठल्यातरी दबावाखाली एखाद्या मराठी कार्यक्रमाला हजेरी लावतात. एखादं वाक्य तुटक्या फुटक्या मराठीत बोलतात. आमचे कान धन्य होतात. लगेच चर्चा अरे बच्चन मराठी बोलला, किंवा ती राणी मुखर्जी मराठीत बोलली.. अय्या, किंवा इंग्लंडची राणी मराठी बोलली.. काय तर, नमस्स्स्त्ते.
१६ डिसेंबरला देशाची राजधानी दिल्लीतल्या रस्त्यावर, चालत्या बसमधे एका तरुणीवर गँगरेप झाला. ६ नराधमांनी तीला किती निर्घृणपणे मारहाण केली हे आता सगळ्यांना माहिती झालंच आहे. त्या मुलीची झुंज अपयशी ठरली, तिचा मृत्यू चटका लावून गेला. त्या काळात अनेकांचे खरे चेहरे काही काळापुरते समोर आले. कोणी म्हणालं भैय्या म्हणाली असती तर रेप झाला नसता, कोणी म्हणालं कुठला तरी मंत्र म्हणली असती तर रेप झाला नसता, कोणी बोललं त्या मुलीचीही चूक होती तर कोणी म्हणालं रेप इंडिया में होते है, भारत में नही.
दिल्लीत तरुणाईच्या असंतोषानं उग्र रुप घेतलं तेव्हा, ना आपले पंतप्रधान समोर आले, ना युवराज. छे़डछाड, बलात्कारासारख्या घटना होऊ नयेत म्हणून आहे त्या कायद्याची कडक अंमलबजावणी करायची सोडली आणि नव्या कायद्याला त्या पीडित मुलीचं नाव द्यायचं की नाही याची चर्चा.
लहान मुलीवर बलात्कार आणि हत्येचा आरोपी, जामीनावर सुटतो आणि तो आठवड्याच्या आत पुन्हा आणखी एका निष्पाप मुलीवर बलात्कार करुन हत्या करतो. नाशिक- औरंगाबादेतल्या घटना, पोलिस आणि न्यायव्यवस्थेचा कुचकामीपणा कळायला पुरेशा आहेत. आपण मेणबत्त्या घेऊन लगेच जमणार पण वेळेवर मदतीला समोर होणार नाही. अर्थात याचा विचार पोलिस आणि न्याय यंत्रणेनंही करायला हवा हे ही तितकच खरं.
पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलेलं चालतं पण हॉकीच्या खेळाडूंना विरोध करुन माघारी धाडणार. भारत –पाकिस्तान दरम्यान व्यापारी करारानं हजारो कोटींची आयात निर्यात होते पण त्यांच्याकडून कांदा आला की त्याला विरोध. मध्यंतरी क्रिकेटर जावेद मियांदाद भारतात येणार होता त्यावरुन वादंग सुरु होतं, का तर मुंबईचा-देशाचा दुश्मन दाऊद इब्राहिमचा तो व्याही. अरे त्या दाऊदचे भाऊ बहीण, नातलग इथेच आहेत. त्याचा भाऊ भारतात परत आला त्याला १० वर्ष उलटली. पण आम्ही लोकांना मुर्ख बनवत मियांदादला विरोध करणार.
पाकिस्तान LOC वर आपल्या जवानांची शीर कापून नेणार म्हणून संताप करणार आणि दुसऱ्या दिवशी आपण पाकला शेवटच्या वनडेत कसंतरी हरवलं की समाधानानं झोपणार.. कशी जिरवली पाकड्यांची.
किरण बेदीनं विमानाच्या इकॉनॉमी क्लासनं प्रवास केला आणि वरच्या क्लासच्या तिकिटाचे पैसे घेतले म्हणून आपण शंख करणार, आणि दरवर्षी खोटी मेडिकलची बीलं इमाने इतबारे कंपनीला देत राहणार.
सलमान खान असो की संजय दत्त, ते समाजात कसं वागतात त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार. त्यांच्या पडद्यावरच्या इमेजमधेच अडकून पडणार. ये दिल का बडा अच्छा है असं म्हणत राहणार. तोच न्याय आपल्या इतरांना लावतो का?
Emotional Fools चा एखादा शेअर बाजार असता ना, तर आपल्या देशानं गुंतवणुकदारांना कधीच निराश केलं नसतं. आपल्या भावनिक मुर्खपणाचा सेन्सेक्स कायम चढा राहिला असता, अधुन मधुन चांगला डिव्हीडंट आणि भरघोस बोनस ठरलेला.
बीडात स्टेडियमजवळ सांगली बँकेसमोरचा रोड खराब आहे, माझ्या लहानपणीपासून. पावसाळा असो नसो अण्णाभाऊ साठे चौकात पाणी साचणं ठरलेलं. गेली अनेक वर्ष कधीही गावाकडे जा, तोच रस्ता, तेच खड्डे, तसंच पाणी आजही असतं रस्त्यावर. एवढंच नाही तर, बीडला रेल्वे आणण्याचा मुद्दा इतका जुनाय की, एवढ्या काळात इंग्रजांनी सबंध आशियात रेल्वेचं जाळं पसरवलं असतं. बीडच्या रेल्वेचं भूमीपूजन कितीदा झालंय की? भरवस्तीतल्या चंपावती क्रिडा मंडळाच्या मैदानावर दोन वेळा झाल्याचं तर मला आठवतंय. बीडला रेल्वे आणणार हे आश्वासन निवडणूकात ठरलेलं.
लहानपणी ऐकलं होतं YOU CANT FOOL ALL THE PEOPLE ALL THE TIME, खरंही वाटायचं. आपल्या देशातली परिस्थिती पाहिली की यातला फोलपणा लक्षात येतो. तेच राजकारणी, तेच मुद्दे, त्याच समस्या, तिच आश्वासनं, तिच हताशा, कुठे काय बदललंय? त्याच राजकारण्यांची तिसरी- चौथी पिढी, त्याच मुद्द्यांवर आपल्याला मुर्ख बनवतेय.
आपला नेता, नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री आपल्या हिताची काम करतो की नाही किंवा आपल्या विभागात – गावात पाण्याची, रस्ते, नाल्याची सोय त्यानं केलीय की नाही यावर त्याच्या कामाचं मुल्यमापन कधीच होत नाही, तर गावातल्या लग्नाला किंवा तेराव्याला तो कसा वेळ काढून येतो यावर त्याचा चांगुलपणा आपण जोखतो.
सिंघम मधे तो जयकांत शिक्रे म्हणतो ना ‘कुछ भी करने का लेकीन मेरा इगो हर्ट नही करने का’… जनतेचं, मॉबचं, गर्दीचं मानसशास्त्र तसंच असावं. राजकारणी असो की मोठी सेलिब्रिटी मंडळी त्यांना याची कल्पना असावी, त्यामुळेच ते जनतेच्या असल्या इगोची खूप काळजी घेतात आणि सुखनैव राज्य करत राहतात.
इमोशनल फुलांच्या देशात हे चित्र नजीकच्या भविष्यात बदलेल असं एखाद्या अति ऑप्टमिस्टालाच वाटत असेल.
छान…emotion full ब्लॉग…आपल्या देशात इमोशनली फुल लोकांची काही कमी नाही…राहुल गांधींच्या उपाध्यक्षपदाचा समारंभ आठवून बघा…ज्याला केवळ गांधी आडनावामुळे ही संधी मिळाली तो भाषणात सांगतो की राजकारणात सर्वांना समान संधी मिळायला हवी…पुन्हा इंदिरा, राजीवजींच्या बलिदानाची गाथा…( आपका इश्क इश्क, और हमारा इश्क सेक्स, राहुलजी? ) ..काँग्रेसवाल्यांनी नरसिंहराव, लाल बहादुरशास्त्री यांचं एकदा नाव घेतल्याचं आठवतंय का बघा….
येस, प्रशांत.. दोन वर्षांपूर्वी युवराज राहुल गांधी मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी ATM मधून पैसे काढले, रांगेत उभा राहून तिकीट घेतलं आणि दुपारी 2-3 च्या निवांतवेळी अंधेरी दादर घाटकोपर वगैरे प्रवास केला. मुंबई लोकल चा प्रवास अच्छा लगा अशी काहीतरी प्रतिक्रियाही दिली होती, किती कौतुक वाटलं होतं म्हणे देशाला.. हेलिकॉप्टरची सोय असताना राहुल गांधी लोकलने गेले.. नायतर आपण मुंबईकर..रोज लोकलच्या गर्दीत कोंबून घेत साधं 1-2 तास प्रवास करायचा म्हटलं की जिवंतपणी नरकयातना आठवल्यासारखं करतो. राहुलबाबांकडून काही शिकलो का आपण गेल्या 2 वर्षात.. नाही, फक्त किरकिर करत राहतो.. गर्दी आणि असुविधा पाहून
होय! म्हणूनच आपले राजकरणी निर्धास्त आहेत. त्यांना चांगलं माहित आहे जनतेला वेठीस कसं धरायचं ते. पुर्वी वाटायचं फक्त भारतीय सिनेमा नर्मातेच जनतेची मानसिक्ता ओळखून सिनेमे तयार करतात. तीचती गोष्ट अनेक वेळा बघूनही आपणं पुन्हा ‘आकाश-वाणी’ त काही तरी डिफ्रंन्ट असेल म्हणून तोही सिनेमा पाहणार आहोत. पणं जसजसे थोडं-थोडं कळू लागलं. 65 वर्ष उलटून गेलीत ज्या संथ गतिने आपणं पुढे सरकत आहेतं असं वाटतं राम भरोसे..सगळं चाललं आहे. आपली मानसिक्ता बदलणं गरजेचे आहे हे ही कळतयं. तरी आपणं नव्या चर्चेकडे वळतोय. आता मोदी की राहूल.. आपल्या सारखे आपणंच..खरच मुर्ख….आहोत.
अगदी बरोबर.. “पाकिस्तान LOC वर आपल्या जवानांची शीर कापून नेणार म्हणून संताप करणार आणि दुसऱ्या दिवशी आपण पाकला शेवटच्या वनडेत कसंतरी हरवलं की समाधानानं झोपणार.. कशी जिरवली पाकड्यांची.”
वाय झेड लोकांचा बाजार झालाय हा देश.
इकडे शीर कापून नेल्यावर हिना रब्बानीच्या फोटो वर लाइक देणारे भारतीय पाहिले की……
मी तर 2-4 उदाहरणंच दिली अशा कितीतरी गोष्टी रोज आपल्या सभोवती घडत असतात.
ज्या काळात (म्हणजे माझ्या लहाणपणी 🙂 ) आजच्या एवढा मोठ्या प्रमाणावर पैसा सर्वसामान्यांमधे सर्रास वाटला जात नव्हता, त्या काळात मोठ्या निवडणुकात मत आपल्यालाच मिळावं म्हणून स्त्रियांना मंगळसुत्राची किंवा कुंकवाची शप्पत आणि पुरुषांना ज्वारी उचलायला लावणाऱ्या/लावणारे राजकारणी काही कमी नव्हते.
तुम्ही लिहलेले सगळे मुद्दे एकदम वास्तव आहेत ,खरच असाच विचार करत असतो आपण …. मी पण ह्या इमोशनल फुलांमधलाच एक आहे… 😦
आपण सारेच 🙂